
Jay Pawar Engagement
बारामती – राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. पवार यांनी केंद्र सरकारने या संदर्भात ठोस धोरण आखण्याची गरज असल्याचे सांगितले. राज्यातील काही भागांमध्ये परिस्थिती बिकट झाली असून सत्तेचा गैरवापर होत असल्याची टीका त्यांनी केली. सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.
शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील सद्यस्थितीबद्दलही चिंता व्यक्त केली. “बीडमध्ये आज ज्या प्रकारची परिस्थिती आहे, ती यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती,” असे ते म्हणाले. राज्यात सर्वत्र धार्मिक वातावरण नाही आणि सध्याच्या स्थितीकडे राष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, असे त्यांनी सुचवले.
जयंत पाटलांसोबत महत्त्वाची बैठक
काल बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. याबाबत बोलताना पवार म्हणाले, “जयंत पाटील यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल स्पष्टता दिली आहे.” काही दिवसांपासून जयंत पाटील पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, या बैठकीनंतर त्या चर्चांना पूर्णविराम मिळेल, असे दिसते.
कृषी क्षेत्रात एआयचा वापर होणार?
शरद पवार यांनी कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वाढता प्रभाव आणि त्याचा ऊस शेतीवर होणारा परिणाम यावर भाष्य केले. “एआयच्या मदतीने ऊस शेतीसाठी कमी पाणी लागेल आणि कृषी क्षेत्राला मोठी मदत होईल,” असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जय पवार यांच्या साखरपुड्यावर भाष्य करण्यास नकार
अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचा साखरपुडा ठरला असून त्यांनी त्यांच्या होणाऱ्या पत्नीसोबत शरद पवार यांची भेट घेतली. या साखरपुड्याला ते उपस्थित राहणार का, असा प्रश्न विचारला असता, “हा काही प्रश्न विचारण्यासारखा आहे का?” असा संतप्त प्रतिप्रश्न शरद पवार यांनी केला.
मस्साजोगच्या सरपंचांच्या कुटुंबाला मदतीचे आश्वासन
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वैभवी देशमुख हिच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलण्याचे आश्वासन दिले. “तिच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ,” असे त्यांनी सांगितले.
शरद पवार यांनी अंजली दमानिया यांनी शेअर केलेल्या केज न्यायाधीशांच्या होळी खेळतानाच्या फोटोबाबत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. राजकीय घडामोडी, शेतकऱ्यांची स्थिती आणि कृषी क्षेत्रात होणाऱ्या बदलांबद्दल शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण मत मांडले आहे.